Friday, January 20, 2012

उत्तरार्ध

योगायोग म्हणा कि उत्तरायण सुरु झाले कि दरवर्षी माझ्या उत्तरार्धाला सुरवात होते. आज वाढदिवसाच्या दिवशी मला उत्तरार्ध सुरु झाल्याचा आभास होतो आहे. वयाची बत्तीशी संध्यांना, संकटांना, जबाबदारीला वा अनेक वेग वेगळ्या गोष्टींना बत्तीशी दाखवतच गेली. कदाचित म्हणून आज जरा गंभीर झालो आहे, निदान हा लेख लिहिताना तरी. असे समजू नका मला 32 व्या वर्षीच अकाली वृद्धत्व आले आहे. सध्याची स्थिती बघता मला माणसाची वयोमर्यादा हि ६० ते ६५ असावी असे वाटत आहे. निदान ही वयोमर्यादा कदाचित मनाची सुदृढ असण्याची असावी.



उत्तरार्ध का म्हणत असावे बरे ? आयुष्याच्या अत्यंत प्रभावी आणि सक्षम विचार शक्तीच्या वयात जे कैक प्रश्न मनात येतात ते शोधण्याची एक संधी देवांनी आपल्याला दिली आहे. पूर्वीचे अर्धे आयुष्य प्रश्नापोटी आणि उरलेले अर्धे आयुष्य उत्तरापोटी असे कालचक्र जणू देवाने घालूनच दिले आहे मानवाला. त्यामुळे माझे असे मत आहे उत्तरार्ध ज्या माणसाच्या आयुष्यात पहिला येतो ती त्याची अंतर्मुख होऊन सत्यासत्याची पडताळणी करण्याची सुरवात असते. कदाचित म्हणून उत्तरायण हे वर्षाच्या सुरवातीला येते. अध्यात्माच्या भाषेत याला 'मोक्ष' च्या अभ्यासक्रमाची सुरवात म्हणता येईल. जरा किचकट आहे पण सोपे होते प्रत्येकाला आज ना उद्या ज्याच्या त्याच्या बौद्धिक नि वैचारिक क्षमतेनुसार उत्तरार्ध सुरु झाल्यावर. म्हणूनच कदाचित पूजनीय ज्ञानेश्वर सारखे एक संत एवढ्या लहान वयात एवढे काही करू शकले. कारण त्यांना उत्तरार्धाची जाण फार लहान वयात आली होती. तुकारामांसारखे साहित्य निर्माण उत्तराधातच होऊ शकले. नि हे सगळे अजरामर होऊन झाले.



परवा देवानंदचे एक गाणे लागले होते, माझा हात रिमोट वर थांबला. t .v चालू असताना सुद्धा मी ते गाणे कानाने अनुभवले. अहाहा काय गोडवा होता त्या गाण्यात !!! कितीही ए आर रहमान येऊ देत, पण किशोर नि रफी ची गाणी चिरंतन आहेत. ए आर रहमान सारख्या एकमेकाद्वितीय माणसांची गाणी अमर होतात ती फक्त आठवणी मधून, पण किशोर/रफी यांची गाणी आज पण लावली जातात. आजच्या उत्कृष्ट गाण्याचे आयुष्य हे मला नाही वाटत २ वर्षाहून अधिक असेल. जी कथा गाण्याच्या तीच कथा साहित्याची ... मी आदरणीय पु.ल.देशपांडे यांचा निस्सीम भक्त. किती वर्ष घालवली तेच तेच विनोद ऐकून वा वाचून, अजून सुद्धा घालवतोय. कोल्ह्टकरांपासून ते पु.ल.देशपांडे पर्यंत अनेक दीग्गज आले नि लिहून गेले. मला नाही वाटत ते साहित्य चिरंतन राहिले किंवा राहील. मध्ये मी एका संकेतस्थळावर वाचले 'जगातील १०० प्रभावी व्यक्ती' ... त्यात दावूद पासून ते सचिन पर्यंत आहेत. अभिनेता सचिन चे गाणे आहे, 'ही दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा. किती आले किती गेले .........'. जोस पर्यंत आपण या असल्या क्षणिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू तोस पर्यंत आपण असमाधानी आणि वैफल्यग्रस्त असू हे निश्चित. अरे रामापासून शिवाजी महाराजापर्यंत, विष्णू पासून येशू, पैगंबर, बुद्ध, महावीरापर्यंत आणि गांधींपासून बिल गेट्स पर्यंत लोक असताना या नावांची यादी मला फारच तुच्छ वाटते. कुठे तरी मी वाचले आहे जगात फक्त १ च माणूस आहे कि ज्याला असा एकही देश नाही जो ओळखत नाही, तो म्हणजे Michael Jackson.



३ अवस्था असतात आयुष्याचा योगी, रोगी आणि भोगी. पूर्वार्ध साधारणतः आपला भोगी होण्यात अथवा असण्यात जातो. ज्यांना वेळीच जाग येते ते योगी होण्याचा एक छोटा प्रयत्न करतात आणि उरलेले रोगी होऊन देह सोडतात. आणि या वाढदिवसाच्या दिवशी मी नेमके हेच ठरवले आहे कि आता चिरंतन गोष्टींच्या शोधात गुंतवायचे मनाला. भगवद्गीता पासून ते अनेक गोष्टींचा विचार करायचा.
माझे पुढील आयुष्य म्हणजेच उत्तरार्ध जास्तीत जास्त सकारात्मक विचारात आणि आचारात जावे हीच ईश्वर चरणी इच्छा. माझ्या मनाची प्रगती म्हणजे मी पर-गती म्हणतो, जे परावलंबी आहे ती, तुमच्यावर सोपवतो. आज पर्यंतचा माझा प्रत्येक क्षण तुमच्या सारख्या मित्रांमुळे अत्यंत आनंदात गेला, या बद्दल


धन्यवाद.



आपला कृपाभिलाषी ,


विजय

Wednesday, January 19, 2011

धावपळ कशासाठी ?

आज माझा वाढदिवस. खरे तर वाढदिवस हा शब्द मी फक्त शरीर पुरता मर्यादित ठेवल्या सारखा दिसतोय. तरी ते जाऊ देत, आज काही तरी लिहावयाची उर्मी मला आली आहे. निदान आज लोक मला सहन करतील हा आत्मविश्वास (फुकाचा) माझ्यामध्ये जागृत झाला आहे. सध्या नोकरी मध्ये पगारवाढीचा महिना सुरु असल्याने, किती वाढणार असा एक चेंडू सारखा डोक्यातील सपाट जागेवर टप्पे खात बसलाय. नेहमी खूप जन वाढदिवसाला निरनिराळे संकल्प करतात. मी आज मागे वळून बघतो तेव्हा लक्षात येते कि भरपूर धावपळ झाली आणि भरपूर पुढे करायची आहे. कोणी तरी म्हंटले आहे ज्या माणसाला कुठे थांबायचे ते कळते तो विवेकी. पण संसार असणाऱ्या माणसाला जर थांबणे कळले तर संसाराची आणि संचयाची गाडी पुढे कशी जाईल. त्यामुळे रज:प्रवृत्तीचा अंगीकार होतो.

लहानपणी मला विचारले तू मोठा झाल्यावर काय होणार - मी चटकन बोललो 'मी गोविंदा होणार'. मी त्याचा मोठा चाहता आहे. उत्तर जेवढ्या जोरात दिले तेवढ्याच जोरात अंगावर कुठे तरी आवाज झाल्यासारखे झाले नि डोळ्या समोर चांदणे चमकत होते ते पण भर दिवसा. तेव्हा मला कळले मध्यमवर्ग चंदेरी दुनिया का म्हणते ते. म्हणा आम्ही म्हणालो आणि तसेच घडले असे फक्त नकारात्मक विचारांचेच होते. अहो आता कुठे पास झालेला १० वीतला मुलगा साहित्य, काव्य, सिनेमा आणि मुली हा विषय सोडून सुतारकाम, वेल्डिंग, प्रयोग इत्यादी गोष्टी करायला लागला तर लोक म्हणतील अरे हा काय मनोरुग्ण आहे का ? तर मी त्याला उत्तर देईन - जन हो त्यालाच तर डिप्लोमा म्हणतात. सडलो अक्षरशः सडलो. अहो अट्टल हाडाचा कलाकार, हाड म्हणण्यापुरता पण उभे नाही करायचे तेव्हा. जश्या करकर वाजणाऱ्या चपला नको असताना कोणी तरी घालायला लावतो, जो घालायला लावतो त्याला वाटते कि वाह काय भेट दिली आहे. पण जो घालतो त्यालाच त्या चावत असतात. तो बिचारा सहन करत जातो. नंतर त्याचा पायाचा मूळ गुणधर्म बाजूला जातो नि पाय कोडगे होऊन जातात त्या भेट देणाऱ्या माणसासारखे.

डिप्लोमा संपला तेव्हा काय निव्वळ वय होते १८. पण आपल्याकडे एक भयंकर प्रथा आहे ती म्हणजे दाखला. दाखला देणे हे आजच्या पिढीच्या नकारात्मक बाजूचे सगळ्यात महत्वाचे कारण. ही काही वाक्य पदोपदी ऐकायला, पाहायला अथवा बोलताना आढळतात - अरे तो बघ नाही तर तू, अरे तिथे बघ नाही तर इथे, त्यापेक्षा तूच का नाही ?, हेच जर तू केले असतेस तर ? तुझे कष्ट त्याच्या पेक्षा थोडे, त्याला बघ किती मार्क ......... मार्क, पगार, प्रगती, पैसे, मैत्री .... कशा कशाचे म्हणून दाखले दिले जात नाहीत ते सांगा. मग काय बाजीराव, माधवराव, शिवाजी यांच्या बरोबर आम्ही, पण थोडे उशिरा, १८ वर्षी चाकरीस लागलो. नोकरीसारखे सगळ्यात भयानक वेळ काढू दुसरे काही नाही असा माझा दावा आहे. वय म्हणजे असे काही पटापट पुढे जाते कि काही विचारू नका. बाहेर छातीठोकपणे सांगतो कि एवढी वर्ष झाली मी काम करतो. तेवढी वर्ष झाली मी आता चीफ आहे ...... मग एक दिवस असाच कुठला तरी दिवस येतो नि आठवते असे अजून आपण काहीच साध्य केले नाही. याला थोड्या वरच्या भाषेत सांगायचे झाले तर स्वार्थ पूर्ण झाल्यावर परमार्थाची आठवण येणे असे म्हणतात. पण परमार्थ हा शब्द वाटतो तेवढा सोपा नाही. ही स्थिती म्हणजे पिण्यापेक्षा मेलेला बरे पण, मरण्याची भीती वाटते म्हणून पिलेल बरे. अशी आहे. पुन्हा नवीन ध्यास लागतो ... पगार वाढ झाली कि कार, घर, जागा, पर्यटन काही तरी एक ठरवायचे नि वेड्या सारखे मेहनत करून धावायचे त्या ध्यासापोटी. म्हणता म्हणता वर सरते, नवीन ध्यासाचा ध्यास घेण्याची वेळ येते नि पुन्हा पगार वाढीच प्रतीक्षा असते. तोस पर्यंत बरेच पाणी पुलाखालून गेलेले असते. जस जसा मनुष्याचा उत्तरार्ध जवळ येतो तोस पर्यंत हाती काय आहे व राहिले याची खंत करत बसायची सुरवात होते.

नोकरी आणि अभियांत्रिकी सी-सो सारखे सांभाळत झाले. आता प्रश्न होता सगळ्यात महत्वाच्या टप्प्याचा. कारण आता मिळणारी नोकरी हि स्थिर करणारी अपेक्षित होती. एक लक्षात ठेवा जेव्हा आपण म्हणतो अपेक्षित होती, तेव्हा ती दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा असते आपल्या कडून. पण आज काळाच्या IT जगतातील अनेक किटाणू जसे जगतात तसेच मी पण जगतोय. रागावू नका तुमच्यातील काही किटाणू IT प्रतीबंधाकातील चांगल्या किटाणू सारखे चांगले पण असतील. पण मी सांगू का हि महागाई, जागेचे भाव, गरिबांचे हाल याचा कुठे तरी दोष हा आपण स्वतः कडे घायला शिकले पाहिजे. त्या शिवाय एक चांगल्या कमावत्या वर्ग कडून समाजसेवा घडेल कशी ? कारण ज्याला अपराधाची भावना आहे तोच सुधारू शकतो. ज्याला वाटते समाजातील काही वाईट गोष्टी माझ्यामुळे आहेत, तरच तो ते भरून काढेन.

माझे सगळे घोडे इथे अडले आहे, मला जे हवे ते मी कधी करूच शकलो नाही. खरे सांगू का गोविंदा, एक छोटा इंजिनिअर, काही वर्षे IT च्या बाहेर असणारा नोकरदार माणूस हे सर्वे मला सुखावून जात होते. पण हवा तसा पाठींबा नाही मिळणे हि तर मध्यम वर्गातील एक श्वासनलिका असल्या सारखे असते असे मला वाटते. आता हे वरील विचार जरी मला किंवा तुम्हाला पटले तरी जसे वय वाढत जाते तसा हा पाठींबा नावाचा प्रश्न संदर्भासहित स्पष्ट सुटत जातो नि त्याच्यावर आपण काय करावे हे पण शिकवत जातो. हे बघा आताचे हे वय असे असते कि सगळे आपलेच बरोबर कारण ते आपल्या मनासारखे असते. आणि त्या नुसार आपण पटवून अनेकदा देतो. खरे तर देत नाही पण आपल्यातील तरुणपणा, उत्साह, तिखट-मीठ लावलेला अनुभव समोरच्याला काही वेळे पुरता भुरळ पाडतो. मग एकदा आचारसहिंता संपली कि परत आपण आपल्या मनासारखे करायला मोकळे. विचार कितीही प्रगल्भ असू देत मग ते गांधीजींचे, टिळकांचे, संस्कृतीचे व कोणाही आदरणीय व्यक्तीचे असले तरी जोस पर्यंत आपले मन ते मान्य करत नाही तोस पर्यंत हा सर्व खेळ व्यर्थ आहे. जसा मी मोठा होत गेलो तसे मला पटायला लागले आपले आई वडील १०० % बरोबर करत गेले कारण तेव्हा ते असलेल्या परिस्थितीत चुकणे म्हणजे स्वताहून हाल करण्या सारखे असावे. मध्यम वर्गाची चुकेचे रूपांतर भोगत होते. तर श्रीमंतांना तीच चूक संधी सारखे देऊन जाते. माझ्या या वाढदिवसाचा अभ्यास इथे संपतो नि मी साराकडे वळतो.

गरीब, श्रीमंत नि मध्यम हे जर तुम्ही अर्थ रुपी समजत असाल तर याला काहीच अर्थ नाही असे मानावे लागेल. या ३ मनाच्या स्थिती आहेत. मनाने खंबीर असणे म्हणजे श्रीमंत, माने चाचपडत पण सकारात्मक असणे म्हणजे मध्यम वर्ग तर नकारात्मक असणे म्हणजे गरीब होय. आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिले जमीन, दुकान कि नोकरी ........ या पैकी काही नाही. त्यांनी दिली ती मनाची श्रीमंती. येणाऱ्या संकटकाळाशी लढत देण्याएवढा खंबीरपणा. असे अमूल्य दान आपल्या कडे असून सुद्धा आपण खंत करतो तुम्ही काय केले ? अरे जसा जन्माला आलास तसाच सोडला असतात तर काय झाले असते. सर्व भौतिक गोष्टी ज्याच्या त्याला मिळवता येतात आणि म्हणूनच त्याला भौतिक सुख म्हणतात. जे फक्त तोच आणि त्याच्या पुरतेच साधू शकतो ते भौतिक. पण हे संस्कार ते अमूल्य आहेत, अबाधित आहेत. ते आपल्या कडे आले तेच पुढे द्यायचे. संस्कार दिल्याने वाढतात कारण जे दिले जात नाहीत ते संस्कार नसतातच.

या अखेरच्या ओळींमध्ये माझ्या आई वडील, मित्र नि शत्रू यांचे आभार मानून पुन्हा पुन्हा वंदन करतो. कारण आज जर मी थोडा जरी कुठे तरी माणूस असेन तर १०० % योगदान त्यांचे आहे. कारण वाईट हा तर मूळ रंगच आहे. कारण जन्म मुळातच स्वार्थातून होतो. माझ्या वाढदिवशी मी असे ठरवतो आता धावपळ करायची ती चांगले संस्कार करण्यासाठी, जे चांगले आहे ते चांगले असेल तर त्या वर खंबीर राहून ते तडीस नेण्याच्या अपर इच्छाशक्ती साठी. अशी ही माझी धावपळ माझ्या अखेरच्या वेळेपर्यंत अविरत आणि अविश्रांत राहू देत हा आशीर्वाद मागातो नि ईश्वर चरणी 'सर्वे सन्तु सुखिनः ' प्रार्थना करतो.

वियोग

Friday, December 17, 2010

सल्ला


                            विजय रात्रीच्या वेळी निघाला होता. गाव अजून दूर होते. झपाझप झपाझप पाऊले पडत होती ... जणू काही जमिनीवरून नुकताच कात टाकलेला साप जात होता. किर्र रात्र, आवाज केल्याशिवाय ऐकू येणार नव्हता अशी वेळ. कदाचित याचीच भीती पाउलांना होती म्हणून मध्ये मध्ये पाला पाचोळा उडवून साथीचा दिलासा स्वतालाच देत होती. विजयाला काही सुचत नव्हते कुणी तरी त्याचा पाठलाग करत aahe असे त्याला निघाल्या पासून वाटत होते. मागे वळून बघायची भीती वाटत होती, म्हणून शबनम मध्ये असलेला आरसा मध्ये मध्ये समोर घेऊन मागे कुणी आहे का हे बघायचा.
                            एवढ्या कडकाच्या थंडीत पण त्याला घाम घाम फुटला. मनाच्या कल्पनेची शक्ती शरीराच्या शक्ती पेक्षा कैक पतीने जास्त असल्याचा हाच एक पुरावा होता. तो जितका जोरात चालत होता तितकेच मन मात्र गावी पोचून कधी एकदा शरीर येते आणि ते झोपते असे झाले होते. वेळ पुढे जात होती, पाला पाचोळा पण साथ देई नासा झाला. पावला मध्ये आता मातीची ढेकळ लागत होती आणि फुटत होती. क्षण भर त्याला फाटत आहेय का फुटत आहे हेच कला नव्हते. त्याचा वेग यामुळे मंदावला. कधी पासून तो याच संधीची वाट बघत होता. विजयाला एका आवाजाचा भास झाला. त्याने आरसा उचलला आणि प्रयत्न केला मागे काही आहे का बघण्याचा..... आरशात बघितले तर मागे त्याला ओलसर काही तरी दिसले. त्याला धडकीच भरली. रडावेसे वाटत होते पण, वय आणि विजन शांतता ते होऊ देत नव्हते. त्याने रुमाल काढला आणि चेरा पुसला. आता मात्र आरशात स्पष्ट मागचे दिसायला लागले. मागे तेव्हा तरी काहीच नव्हते. रुमाल मात्र ओलाचिंब झाला होता. ढेकळ पण संपली होती. पुन्हा एकदा त्याला वेग सापडला.
                               अंधाराने आता पूर्ण काळी घोंगडी पांघरली. विजयाचा धीर सुटायला लागला. त्याने ठरवले कुठेतरी विसावा घ्यावा. तो योग्य जागेची वाट बघत जात होता. तेवढ्यात एक वटवाघूळ ओरडत जवळून गेले. ढास !!! त्याला यमदूत बघून गेल्याच भास झाला. मागे न बघतच त्याला लक्षात आता वटवाघूळ काहीतरी दिसले नि ते जमिनीवर पडले. त्याला पहिल्यांदा वटवाघूळ सरळ आडवे झालेले दिसले. आता मात्र विजयची नजर वायू वेगाने आधार शोधायला लागली. भुकेल्याला आणि भीतीला देवाने तीक्ष्ण कानांचे वरदान दिलेले असते असे म्हणतात. लांब कुठे तरी कुत्रे भून्क्लेले त्याने ऐकले आणि तो जवळ पास पळतच निघाला. त्याला कुत्राची पण भीती या वेळी छोटी वाटत होती 


                              हळू हळू कुत्र्याचा आवाज जवळ आला. या आवाजामुळे त्याला जिवंत असल्या सारखे वाटले. इतर वेळेला मार्ग बदलणारा विजय आज कुत्र्याच्या दिशेने जात असलेला बघून, कदाचित तो श्वान भुंकत नसून हसत आहे असेच नियतीला वाटले असेल. आज विजयची खात्री पटली माणूस हा प्राणीच आहे. संगत नसेल तर आयुष्याची पंचापाक्वन्नाची पंगत पण उकीरड्या सारखी वाटते. तिथे एक मंदिरासारखे दिसले. विजयाला आता त्या श्वानात साक्षात गुरु भेटल्याचा आनंद झाला नि भीती पळून गेली.
                                 तो पायऱ्या चढून मंदिराच्या आवारात गेला आणि पहुडला. पायांची यंत्रे थांबल्याने त्याचा डोळा हळू हळू लागायला लागला आणि तेवढ्यात ........... त्याला कुत्र्याची आर्त किंकाळी ऐकू आली आणि तो घाबरून उतला आणि त्या कुत्र्याच्या दिशेने पाळला पण मंदिराची शेवटची पायरी ओलांडायचे धाडस त्याच्या मध्ये नव्हते. ते कुत्रे केविळवाणे आवाज काढत मरता मरता विजय कडे बघत शेवटचे ओरडले. आता मात्र विजयाचा ताबा गेला आणि तो ढसाढसा रडायला लागला. त्या अंधाऱ्या जगात कुत्रा क्षणभर नाते निभावून गेला. विजय थरथर कापायला लागला आणि तो गाभाऱ्याच्या दिशेने पळाला. तो दार उघडणार तोच दारानेच वाऱ्याच्या मदतीने त्याला वाट दिली. तो धापा टाकत आत एका दगडावर आपटला आणि तिथे एक पाटी दिसली - ' हि जागा नियोजित दशक्रियाविधीकरता राखीव आहे. तरी याचा वापर विश्रामाकरता करू नये. ' विजयचे डोळे भिरभिरायला लागले आणि त्याला अजून एक पाटी दिसली. - 'सल्ला ऐकला असता तर .........' आणि तर शब्दातील र ची रेघ फरफटत खालपर्यंत आली होती. जणू कोणी मरणप्राय वेदनेने सांगत होते - ''सल्ला ऐकला असता तर ......... '.  त्याला त्याचा बोध झाला नाही पण त्याने तो बाधला. त्याने ठरविले कि इथून पळायचे.
                                     तो जोरात सुटला, चालत म्हणा किंवा पळत म्हणा. त्याला लहानपणापासून जेवढी स्तोत्रे येत होती तेवढी तो मोठ्याने म्हणत निघाला. पहिल्यांदा त्याला बरे वाटले, पण नंतर तो स्वताच्याच आवाजाला घाबरायला लागला. अजून अंधार गुडूप होतेच. त्याच्या वेगामुळे त्याला गावाकडे जाण्यापेक्षा जणू गावच इकडे येत येत असल्याचा भास होत होता. जसे पाय हवेत आहेत नि जमीन जोरात मागे सरकती आहे. एवढ्या वेळच्या अथक भीतीपोटी तो दमला होता शरीराने पण आणि मनाने तर जास्तच.
                                    त्या डोळ्यावर झापड होती. माणसाला जेव्हा अशी झापड येते, तेव्हा अनुभव मात्र डोळ्या समोर नंगा नाच करत असतो. त्याला कळलेच नाही तो कधी झोपला आणि त्याने डोळे उघडले तेव्हा त्यांनी बायको त्याच्या डोक्यावरची दुधाची पट्टी बदलत होती. ती म्हणाली - 'धनी एवढ्या तापत कशाला यायचे. कुठे तरी आराम करायचा'.  त्याने तापतच सगळा अनुभव तिला सांगितला पण त्या अर्धवट पाटी बद्दल तो काही नाही बोलला. राहून राहून त्याच्या नजरे समोर ''सल्ला ऐकला असता तर .........' हीच अक्षरे पुन्हा पुन्हा दिसत होती. आता बायकोला ऐकून घाम फुटला. तिने प्रेमाने धन्याला भाळी चुंबन दिले आणि  म्हणाली त्यापेक्षा माझा सकाळीच येण्याचा 'सल्ला ऐकला असता तर ..........'. आणि पुन्हा विजयाला  भोवळ आली.

============================================
Vijay Albal

Tuesday, December 7, 2010

नकोत नुसत्या भिंती

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती
घरपण नसेल जर तिथे तर नका सांगू किमती

तुमचे एक हास्य नि काळजी, भरून येते आम्हा
असेच लाख लाभो आयुष्य भर तुम्हा

कर्ता पुरुष त्याचे खांब, आईबाबांचा असे गाभा आत,
सून भरे प्रेम त्यात, कुटुंब पूर्ण होते जेव्हा असते कुणी नात

मिटती साऱ्या चिंता, शमती वेदना जेव्हा पडते पाउल घरी,
दुग्धशर्करा योग असेल तेव्हा मिळाले जर गुणी शेजारी

आमचे हे अहो भाग्य लाभले असे सासर
दृष्ट काढुनी घ्या जेव्हा मिळेल तुम्हा अवसर .....
  ~Vijay

Monday, December 6, 2010

चितळे

चितळे

कधी कधी ऑफिसमध्ये दुपारी वाटते वेगळे,
त्या पेक्षा
झोपावे बनुनी चितळे,

धंदा गेला खडय्यात झोपेला महत्व,
1 ते 4 घोरुनी टिकवावे सत्त्व

मस्त पोट भरून डुलकी ती येणार,
मी नाही म्हणतो तरी थोडीच ती जाणार

चुकून गेलो मी
झोपून तर होईल कल्ला,
माझ्या पोटायेवढा असणारा होईल मुडदुशी गल्ला

तुम्ही कोण सांगणार, पेक्षा आपले झोपलेलेच बरे,
आमचा धंदा बरा नि आम्ही त्यातच सुखी बरे

1 ते 4 मध्ये आता , नका
मागू काहीच काका,
अस्सल आहे चितळे हा, नाही कुठलीच शाखा












 






~वियोग

Monday, November 22, 2010

पुढारी

पुढारी

--------------------

काय सांगू तुम्हाला आहे कोण मी ?
लहानपणापासून होती कुठेतरी कमी
जमतचं नव्ह्ते हो मला काही काम
शाळेत तर नापासांमध्ये माझे नाम


शाळेमंदी लय बोलायचे मला टाकून
उभे करायचे वर्गाबाहेर अंगठे धरून
मास्तुरया बापासमोर फटाफटा देई गाली
बाप पण काढायचा आवाज कानफटाखाली


ही नाचक्की सहन करत, सुटलो एकदाचा शाळेतून
गेलो कॉलेज मंदे पन, शिकायचे नव्ह्ते मनातून
शिकायला जरी असलो मी सो सो आणि नाजूक
घाबरून व्हायची पोरे माझ्या समोर भावूक


बनवला मी मग माझा एक छोटा गट
केली जर कुठल्या सरांनी अतिच वटवट
मग आमचा गट ,धावून जायचा खास
व्हायची माझ्यासारखी पोरे मग मेरीट मध्ये पास


एकुण सगळे बघता लावला पालकान्नी डोक्याला हाथ
त्यान्ना वाटले म्हातारपणी मिळनार नाही पोराची साथ
म्हातारा भडकला आणि बोलावले २-३ तांन्त्रिक
सगळे फोल नाही उपयोग , असू दे अंगार वा मांन्त्रिक


तेवढ्यात आमच्या गल्ली मध्ये आल्या विलेक्शन
सम्दया पोरान्नी केले माझे एक मुखाने सेलेक्शन
बापाने धरला हात आणि ओढत आणला घरात
माई आली मधी म्हण्टली एवढी एलेक्शन द्या पदरात


मग पुढे काय विचारता विलेक्शन वर विलेक्शन
सगळीकडे आपलीच व्हायची बर का सेलेक्शन
हळू हळू बाप पन म्हन्टला गड्या लै भारी
तुझ्यातले गुण नाही ओळखले चूक झाली माझी खरी


आता मी एक मोऒऒऒठा झालो आहे पुढारी
आमच्याच मास्तरला ठेवलाय आहे दफ्तरी
आणि आमच्या शाळेतील येनारे सगळे अव्वल नम्बरी
हाफिसात माझ्या कडे लावतात आज काल हजेरी


~Vijay

Thursday, November 11, 2010

वडा देवू कुणाला गरम आता .....नाट्य 'वडा' (किंवा 'वेडा') संगीत

चाल - वद जावू कुणाला शरण (संगीत सौभद्र )
(विडंबन)

वडा देवू कुणाला गरम आता,
करी जो शमन भूकेल्याचे ...मी भरीन पोट तयाचे,
अग वडे काढ ये , अग वडे काढ ये

जे कर जोडूनी मज पुढे, मागती वडे ... ग्राहक ते,
फुकटची खावू पाहे, अग वडे काढ ये

असे तेलही उकळे, मनातले ... मला हे कळे
जिभल्या चाटून लाळ गळे, अग वडे काढ ये

असा ठेचा हा भरला, सांडला ...थोडा बाहेरही आला ,
नाक पुसुनी हा हा ओरडला, अग वडे काढ ये

तोंड हे असे पेटले, जिभेचे चोचले ...सगळे झाले,
पोट भरे तरी तो बोले, अग वडे काढ ये

एक नंबर मजा हि आली, भूक मिटली ...तासांची हि,
दक्षिणा आम्हास हि पावली, अग वडे काढ ये

वियोग

Wednesday, November 10, 2010

दुपारची झोप

दुपारची झोप

-----------------------------------------------------------------------

येता तू घरी एका टळटळीत उन्हात
काहीश्या आवाजात सांगून गेलीस कानात
तू ओरडलीस " अरे मला उकडत आहे "
मी म्हणालो " थांब जरा फ़ॅन लावत आहे "


लावल्यावर फ़ॅन तू म्हणालीस ' हुश्श ' अशी
८ मजले जिन्याने चढून आली कशीबशी
मी म्हण्टले " आता तरी होईल तुझे वजन कमी "
तु म्हणेस " जास्त आवाज नको आधी दे तुझ्या पोटावरील टायरची हमी ? "


आता मी काय करणार तिच्या अश्या बोलण्यावर
बहुथा वाढतं वय दिसत असावे पोटावर
विचार आला हा मनात आणि गेले अचानक लाईट
आणि परत सुरु झाली आम्हा दोघांची फ़ाईट


लढता लढता दमलो आम्ही दोघे
कोणी तयारच नव्हते हटायला मागे
अचानक तिने माझ्या कानफ़टात लगावलेली होती
भानावर आल्यावर लक्षात आले संध्याकाळ झाली होती


उठलो ताडकन आणि बघतो तर ती
ऒ कोण होती ती, ती तर माझी झोप होती
बघतो तर "सी यु ऍट नाईट !!" म्हणत
माझी झोप चालली होती


~Vijay Albal

Monday, October 25, 2010

भिंती

भिंती

------------------------------------------------------------------

भिंती भिंती भिंती भिंती

अहो किती झाल्या आहेत यांच्या किंमती

आम्ही पण निघालो जमवून हिंमती

विचार करता यातल्या, दिसतात मला गंमती



कुणी म्हणा ऑफ़िस, कुणी म्हणा घर

बदलते व्याखा, बदलल्या भिंती जर

म्हणती लोक असतात, भिंतींना पण कान

काही जण घालती पुजा, भिंतींना देऊन मान



असल्या भोवती जर भिंती

तर वाटत नाही कुणाची भिती

जगाची काहीही असो गती

भिंती मध्ये पण घडतात, गोष्टी या किती



दवाखाना, तुरुंग, दुकान प्रत्येक भिंतीचा वेगळा स्पर्श

ओळखीची दिसता भिंत, होतो मात्र परमहर्ष

अश्या या भिंती, राहोत सदा आपुल्या भोवती

यांच्या शिवाय जीवनी, नाही शांती नाही प्रगती



Vijay

Wednesday, August 18, 2010

ओल्या आठ्वणी

ओल्या आठ्वणी

--------------------------------------------

किती वाटते ते रम्य
बसूनी स्वःताहाच्या घरात
कष्टाने आणि नशीबाने
पडले सगळे पदरात

लुटतो आहे त्याची
सध्या मी खूप मजा
बघितली झोपडी, गरीबी
वाटते मला सजा

आज आहे घरात एसी, टीवी,
छोटासा एक बार
जेवण स्वःताचे करताना
होतात कष्ट फ़ार

एका फोन वर येतो
घरी मस्त तो पिझ्झा
बसल्या ठिकाणी खायला
मिळण्यात आहे मज्जा

मस्त बसूनी मी २०व्या मजल्यावर
देतो सिगारेटचे झुरके
बघता तिथून भवतालीचे जग
आठवतात ते हुंदके

पावसात कधी तेथून पाहतो
हतबल झालेली झोडपे
कळते तेव्हा असे जगणे
नसते मुळीच सोपे

वाटे मग पाऊस तेव्हाही पडायचा
आणि आजही कोसळतो
स्पर्श जरी मला नसेल करत
आजही तसाच खेळवतो

घुसूनी पाणी व्ह्यायची
तेव्हा ओली घराची धरणी
आता मात्र फ़क्त तरारते
या नयनी आठवणींचे पाणी

यायचा मग घेऊन कडेवर
माझा तो कष्टाळू पिता
पदराचा करायची छप्पर
माझी भोळीशी माता

दोघे जागे रहायचे
रात्रभर बिचारे
का कुणा साठी माझे
मन मला विचारे

त्यांच्या संगतीत
सुरक्षितता होती
संसार फ़ाटका होता
पण प्रत्येक क्षणी सोबत होती

आज माझ्या संगती
नाही कुठलीच नाती
मनात फ़क्त पावसाच्या
जुन्या आठवणी कोसळती

-Vijay

Tuesday, August 17, 2010

अपेक्षा


अपेक्षा
-----------------------------------------------------------------------------
असतील जगात अनेक प्राणी , मानव कोणी तर पक्षी कोणी
नाना स्वभाव , नाना भावना , नाना चिंता , नाना कामना
असला कुठलाही समाजस्तर , त्याचा लाभ होईस्तोवर
आपले स्थान त्याच्या मस्तकावर , अक्कल येते घसरल्यावर
अनेक शिक्षा , अनेक कक्षा , सर्व ठायी किंतु अपेक्षा
मोडता ती सलते शिक्षा , वाटते नसती ठेवली अपेक्षा त्यापेक्षा

अपेक्षेवरती असे आयुष्यचक्र ,
तत्पूर्तीसाठी कोणी लडिवाळ, तर कोणी वक्र
पाल्याच्या पालकाकडून, नोकराच्या मालकाकडून ,
थोर बसले अपेक्षा ठेवून, गेले जीवन मात्र सडून

देवकृपेने अवतरला बालक
तेच मूळ अपेक्षा ठेवती पालक
होईल माझा बाल्य आज्ञाधारी
जीवन इमारत अपेक्षा पायरी

मी वाढविला , मी शिकविला
मी पाळला , मी सांभाळला
मी खर्च केला , मी जगविला
मी पोसला , मी सोसला
माझे मन , त्याचे जीवन

आता काळ माझा जवळ
आला का अपेक्षापुर्तीचा काळ ?
हे पाल्या तूच पोस , तूच सांभाळ
तुटती स्वप्ने , ठरे अपेक्षा खोटी
पाल्य झाला कठोर , का मोडली का काठी ?

होता होता मी गेलो शाळेच्या दारात
रोज वदे नवी अपेक्षा घरात
प्रेम , ममतेच्या तर कधी अश्रूंच्या भरात
रडता रडता निघे अपेक्षांची बारात
मग महाविद्यालयात , तर कधी नोकरीत
आयुष्यात प्रत्येक पायरीत
अपेक्षाभंगाचे ओझे सावरीत
गेलो पुढे पुढे मी ऎटीत

म्हणून वियोग म्हणे व्हा खंबीर
हे वीरा धर जरा धीर
सोडूनी अपेक्षेचा पक्ष
कर स्वप्रवृत्ती निर्मळ निरपेक्ष 

~vijay

Monday, August 9, 2010

सॉफ्ट्वेअर इंजिनीयर चे लाईफ़.............

सॉफ्ट्वेअर इंजिनीयर चे लाईफ़.............
------------------------------------------------------------------------------

मन म्हणते ऊठ ऊठ... झाला जिम चा टाईम
शरीर म्हणते त्रास देऊन... करु नकोस क्राईम
मग मी देतो मनाला, अजून ५ मिनिटांचे ब्राईब
मन म्हणते ओके , मग तू का केलेस जिम सब्स्क्राईब

काय करु दिवसगणिक वाढतेय माझे फॅट
काम नही , खुर्चीत बसून करतो फक्त चॅट
खावून खावून वाढलीय पोटाची ही गॅलरी
खाण्याआधीच दिसतात खाण्यातल्या कॅलरी

एकदाच झाला क्लायंटचा तो कंन्फ्रन्स कॉल
मग चालू होतात पिच्चर्स, तुडवला जातो मॉल
होत मग सोमरसाचा कधी लार्ज आणि कधी स्मॉल
त्यामुळे होतो गोंधळ... दिसते म्हातारी पण डॉल

हे असेच आहे सॉफ्ट्वेअर इंजिनीयर चे लाईफ़
फरक नाही पडत, आली जरी वाईफ
हे लाईफ़ म्हंजे बिस्कीट , पैसा त्यातले क्रिम
पण सर्वै सन्तु सुखिन: हेच आमचे ड्रिम

~वियोग

Wednesday, July 21, 2010

महाभारत

       आपण जेव्हा परीक्षा देत असतोतेव्हा आपल्याला सांगितले जाते कि अमुक अमुक पुस्तकातील प्रश्न येतीलकाही जन तर इतके ठाम असतात कि विचारायची सोय नाहीते म्हणतात या पुस्तकाच्या बाहेरचे काहीच नाही जगात. असाच मी एकदा शांत बसलो होतो. मी शांत बसलो होतो म्हणजे मी खूप व्यस्त होतो. गोंधळून जाऊ नका, मी बरेचदा नाशवंत जगापासून बाहेर फेरफटका मारून येतो.  मनासारखे एकाच जागी बसून फिरून येण्यासारखे वाहन नाही. मला तर प्रश्न पडतो कि हि देव लोक कशाला उंदीर, मोर, वाघ, सिंह घेऊन फिरतात.

       तो दिवस रविवारचा होता, मी निवांत बसलो होतो. डोळ्यासमोरून काही दिवसात येणारी वादळी परीक्षा दिसत होती. परीक्षा म्हंटली कि माझे डोळे अंधुक होतात आणि पंख्याचा वारा पण वादळासमान भासतो. जे होणार आहे ते माहित असल्यामुले मी अभ्यास करायच्या फंदात पडत नाही. पण पुढे बसणार्याशी मैत्री मात्र जमवतो. असे शांत बसता बसता झोपेने  कधी मिठी मारली कळलीच नाही. मी तिच्या मिठीत गारद होणार तेवढ्यात एक आजोबा आले नि म्हणाले 'बाला  अरे पलंगावर वर जाऊन जोप ? नाही तर अवघडून जाशील'. हे म्हणजे सिगरेट पिताना कोणी तरी व्हिस्की ऑफर केल्यासारखे वाटले. पण माझ्यातला अभ्यासू अजून जिवंत होता आणि महत्वाचे म्हणजे जागा पण होता. मी म्हणालो 'अहो आबा परीक्षा आहे. काही कळत नाही म्हणून डोळा लागला बाकी काही नाही'. आबा म्हणाले 'ठीक आहे' आणि जाताना एक पुणेरी पिंक टाकली 'आज कालची मुले म्हणजे रडकीच आहेत. या जगात महाभारताच्या बाहेर काही नाही, कधी कळणार यांना ?'

      मी ताडकन उठलो आणि काही बोलणार तेवढ्यात विचार केला एवढा वयस्कर माणूस जर काही तरी बोलला असेल तर काही तरी नक्कीच तथ्य असेल. मग मी आमच्या माडीवरच्या खोलीत गेलो, हळूच लाबकत लाबकात जणू एखद्या बोक्यासारखा. त्या तिथे बरेच वर्षे धूळ खात बसलेली पुस्तके पडलेली. मी फुंकर मारली आणि एकाच धुराळा  उडाला जणू माझ्या   मनावरील धूळ होती कि काय असे वाटले.  मी ठरवले महाभारत वाचून काढायचे. माझे मन नुसत्या विचारांनीच रोमांचित झाले. दिवस-रात्र, दुपार-संध्याकाळ मी वाचण्याचा सपाटा लावला आणि जणू काही पिसातल्या सारखे ते संपवून टाकले. रोज काही तास मी ध्यान करू लागलो. मनात, जनात, आहारात, विचारात एकाच विचार एकाच गोस्त शोधू लागलो या जगात एक तरी गोष्ट अशी असेल जी महाभारत्च्या महाकाव्यात बसणार नाही. शेवटी दमलो आणि ज्या दिवशी मी हा शोध थांबवला त्या दिवशी मला पहिल्यांदा एका अनामिक शांततेचा साक्षात्कार झाला.

      रात्रीचे वाजले होते मला लागलेली आध्यात्मिक झोप झाली आणि एका सीरिअल चा आवाज ऐकू आला 'या गोजिरवाण्या घरात'. मी स्वताशीच हसलो आणि पाहू लागलो तर चक्क त्या मध्ये सुद्धा कोणी तरी श्रीकृष्ण बनून शामराव नामक माणसाला उपदेश होते. मला सर्वकडे महाभारत दिसू लागलो. माझ्या वागणुकी पासून ते अगदी परवाच्या 'नटरंग' मधील गुणा पर्यंत सगळ्या महाभारताच्या संबंधित व्यक्ती रेखा दिसू लागल्यामी शांतपणे विचार करत गेलो आणि एक गूढ लक्षात आले.  ब्रह्मांड जर अक्षरी रूपात अवतरले तर त्यालाच महाभारत म्हणत असावेत

      अरे एक माणूस दाखवा जो महाभारताच्या चौकटीत नाही बसत असा ? आणि त्याचे सार आपल्याला गीते मध्ये दिसतेचत्यामुळे सर्व संतांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि त्यावर आधारित सूत्रे सोपी करून आपल्याला सांगितलीहे सगळे सांगण्या मागचे प्रयोजन एवढेच कि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 'महाभारत' वाचा, रुजवा. एवढे ज्ञान दुसऱ्या कुठल्याही पुस्तकात नाही.                     

थोर ती भगवद्गीता .....थोर ते महाभारत आणि थोर ते व्यास ज्यांचा परीघ आपल्या कक्षेत नाही  !!!!!

~विजय